महाराष्ट्र

पुणे-सोलापूर महामार्गावर फायरिंग करत 3.60 कोटी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून 3 कोटी 60 लाख रुपये लुटून धूम ठोकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) ला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आंगडीया कंपनीच्या वाहनातून ही लूट करण्यात आली होती. गोळीबार करत रक्कम लुटल्याप्रारकरणी इंदापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती.. आरोपींकडून पोलीसांनी 1 कोटी 43 लाख 20 हजार रूपये जप्त केले आहेत.
पोलीसांच्या पथकाने सागर शिवाजी होनमाने रा. कुर्डूवाडी ता. माढा जि.सोलापूर याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय 32 वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि रजत अबू मुलाणी (वय 24 वर्षे, रा. न्हावी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलीसांनी तपासात सागर होनमाने याकडून 72 लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडुन 71 लाख 20 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 43 लाख 20 हजार रूपये जप्त केले आहेत. त्यादरम्यान अटक प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी गौतम अजित भोसले (वय 33 वर्षे, रा.वेने, ता. माढा, जि. सोलापूर), किरण सुभाष घाडगे (वय 26 वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि. पुणे), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय 25 वर्षे, रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, जि.पुणे) यांना राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतलेले आहे.
26 ऑगस्टला मध्यरात्री 3 कोटी 60 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यापैकी फक्त 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. बाकी रक्कम वसूल करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी आणखी कुणाची नावे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. इतकी आंगडीया कंपनीची रक्कम ही स्कॉर्पिओ गाडीतून नेणार आहेत याची माहिती आरोपींना कशी मिळाली? कॅश वाहून नेणाऱ्या कंपनीतील कुणी फुटीर आहे का? अशा अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Related posts