पंढरपूर

‘विष्णुपद’ येथे भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव

सचिन झाडे –
पंढरपूर:-  विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या परिवार देवतांपैकी  श्री. विष्णूपद मंदीर असुन, प्रतिवर्षी पंरपरेनुसार येथे मार्गशीर्ष महिन्यात म्हणजेच दिनांक 5 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी. तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
श्री. विष्णूपद मंदीर येथे मार्गशिर्ष महिन्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर  करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत प्रांतकार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण पवार तसेच मंदीर समितीचे श्री.कोकीळ उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, श्री. विष्णूपद मंदीर येथे मार्गशिर्ष  महिन्यात दिनांक 5 डिसेंबर ते 2 जानेवारी कालावधीत भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने  कोरोना संसर्ग तसेच स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपालिकेने श्री. विष्णूपद मंदीर परिसराची स्वच्छता करुन घ्यावी. स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. मंदीर व मंदीर परिसरातील अतिक्रमणे काढावीत. वाहतुक व्यवस्थ्रेसाठी वाहन तळाची व्यवस्था करावी.  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याने विनामास्क असणाऱ्या भाविक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. मंदीर व मंदीर परिसरात प्रखर उजेड राहील यासाठी आवश्यकती व्यवस्था करावी. या कालावधीत अनेक भाविक  श्री. विष्णूपद मंदीर परिसरामध्ये वनभोजन करीत असतात यासाठी परिसरारात दररोज  स्वच्छता राहिल याची दक्षता घ्यावी.  पोलीस प्रशासनाने या कालावधीत वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी वाहतुक व्यवस्था सुरळीत याची दक्षता घ्यावी.  तसेच  या परिसरामध्ये कोणताही अनुचित घटना घडणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
मंदीर समितीने श्री. विष्णूपद मंदीर व परिसरात आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करुन घ्यावे. आवश्यक ठिकाणी सॅनेटायझरची उपलब्धता करावी. दर्शनीय तसेच आवश्यक ठिकाणी सुचना फलक लावावेत. भाविकांमध्ये सामाजिक अंतर राहिल यासाठी उपाययोजना कराव्यात.  दर्शनासाठी येताना हार फुले घेवून येण्यास मनाई असल्याने कोणाताही भाविक हार फुले घेवून येणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकाची नेमणून करावी ,अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री.गुरव यांनी यावेळी दिल्या.
पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपयायोजना करण्यात येतील असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले तर नगरपालिकेडून भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यावेळी सांगितले.

Related posts