उस्मानाबाद 

दर रविवारी जनता कर्फ्यू व धार्मिक स्थळे बंद तर सर्व आठवडी बाजार बंद.

धाराशिव (उस्मानाबाद) – दैनिक राजस्व (प्रतिनिधी)

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले असून यापुढे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु असणार असून त्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे , मंदिरे ही दर रविवारी बंद राहणार आहेत. धार्मिक विधीना केवळ 5 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री हा नियम लागू असणार आहे. जिम , क्रीडांगणे, व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील तर मोठ्या स्पर्धा घेण्यावर बंदी असणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात सभा मोर्चे उपोषण आंदोलन यांना बंदी असणार असून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये फंक्शन हॉल लॉन्स हे बंद राहतील तसेच जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू राहणार असून विनाकारण रात्रीच्या प्रवासावर बंदी असणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस कमी जास्त होत असल्याने प्रशासनासह नागरिकांची धाकधूक वाढली आहे. 3 मार्चला 16 रुग्ण, 4 मार्च 45,5 मार्च 26,6 मार्च 30,7 मार्च 49,8 मार्च 16, 9 मार्च 38 रुग्ण तर 10 मार्चला 24 रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 265 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 32 हजार 923 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 582 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 13.86 टक्के आहे. 16 हजार 731 रुग्ण बरे झाले असून 95.16 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे. आजवर कोरोनाने 586 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.33 टक्के मृत्यू दर आहे.

उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरु असले तरी नागरिकात स्वतःहून जनजागृती येणे गरजेचे आहे तरच कोरोना नियंत्रण शक्य आहे.

Related posts