उस्मानाबाद 

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा केंद्रीय प्रकल्पामध्ये समावेश करून निधी उपलब्ध करण्यात यावा. – खा. ओमराजे निंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – आज आकांक्षित जिल्ह्याच्या संदर्भात केंद्रीय जलशक्तीमंत्री मा.ना.गजेंद्रसिंग शेखावतजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीस नवी दिल्ली येथुन धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवून धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, किमान कौशल्य आधारित उपक्रम राबवणे. तसेच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा केंद्रीय प्रकल्पामध्ये समावेश करून निधी उपलब्ध करण्यात यावा. अशा विविध सूचना केल्या.

या चर्चेत बोलताना खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले की, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. सदर जिल्ह्यात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. जिल्ह्यातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅंकेतून पीक कर्ज शंभर टक्के टार्गेट प्रमाणे वाटप होत नाही. असंख्य पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहतात. त्यामुळे आपल्या मार्फत राष्ट्रीय बँकास आदेश व्हावेत. तसेच जिल्ह्यात किमान कौशल्य आधारित उपक्रम राबविण्यात यावेत. यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.

मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील 21 टीएमसी पाणी देण्यासाठी ऑगस्ट 2000 मध्ये योजना मंजुर झाली होती. या योजनेतून मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रकल्पांची कामे दोन टप्यात पूर्ण करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. राज्य शासन प्रकल्प पुर्ण करण्यास प्रयत्नशील आहे. परंतु या प्रकल्पास लागणार निधी व राज्यशासनाची परिस्थिती मुळे प्रकल्प तात्काळ पुर्ण होण्यास विलंब लागत आहे.

कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाला केंद्रीय जल आयोग (Central Water Commission) ची मान्यता नाही. त्यामुळे सदर प्रकल्पास केंद्र शासनाकडील निधी मिळन्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या भागास न्याय देण्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या अंतर्गत येणारे सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पाचा केंद्रीय प्रकल्पामध्ये समावेश करून निधी उपलब्ध करण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध विषयांवर चर्चा खा. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केली.

याबैठकीस केंद्रीय जलशक्तीमंत्री मा.ना. गजेंद्रसिंग शेखावतजी यांच्यासह धाराशिव (उस्मानाबाद) चे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जलशक्ती विभागाचे मुख्य सचिव, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अमिताभ कांत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तसेच सर्व सन्मानित सदस्य उपस्थित होते.

Related posts