महाराष्ट्र

रुग्णवाढ अजून वाढली, तर मोठी अडचण – मुख्यमंत्री

राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र, रुग्णसंख्या अजूनही नियंत्रणात येत नसल्यामुळे हा लॉकडाउन आता १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यादरम्यान केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना या टप्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र लसीचा पुरवठा पुरेसा मिळेपर्यंत या वयोगटासाठी व्यापक लसीकरण सुरू करता येणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. १ मे पासून राज्यात या वयोगटातल्या नागरिकांना प्राथमिक स्वरूपात मोजक्या केंद्रांवरच लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आपण बेड, इतर गोष्टी वाढवू शकतो. पण डॉक्टर, नर्सेसचं काय? आता तर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागतो आहे. राज्यात रोज १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होऊ शकतो. पण आज आपण १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज वापरतो आहोत. आपण बाहेरून ऑक्सिजन आणण्यासाठी आणि त्याच्या वाहतुकीसाठीही पैसे देत आहोत. ही फार विचित्र परिस्थिती आहे. आपण ही परिस्थिती समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहोत. पण रुग्णवाढ अधिक वाढली, तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाने रुग्णसंख्या स्थिरावली आहे. ऑक्सिजन काठावर पुरवत आहोत.

त्यासोबत लिक्विड ऑक्सिजनची ने-आण शक्य असते, पण गॅस ऑक्सिजनची वाहतूक शक्य नसते. मग जिथे गॅस ऑक्सिजन असेल, तिथे आपण कोविड सेंटर उभारतो आहोत. त्यामुळे ऑक्सिजन रुग्णापर्यंत नेणं शक्य नसेल, तर रुग्णाला ऑक्सिजनपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. राज्य सरकार आपल्या खर्चाने २७५ पीएसए ऑक्सिजन प्लांट लावत आहे. येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होतील.
अचानक रेमडेसिविरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सगळ्यांना रेमडेसिविर पाहिजे. आपल्याला रोज सरासरी ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. याचं वितरण केंद्राने स्वत:च्या हातात घेतलं आहे. सुरुवातीला आपल्याला २६ हजार ७०० च्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली. मी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य करून ४३ हजार रेमडेसिविरची सोय करण्यात आली. आज रोज ३५ हजारच्या आसपास रोजचे रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. पण एक गोष्ट आहे, की आपल्या टास्क फोर्सने आणि तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर करु नका. गरजेपेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
कालच मी राज्यातल्या जिल्हाधिकार आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. राज्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी २० ते २५ दिवसांचा काळ लागू शकतो. येत्या काही दिवसांत आपले हे सगळे प्लांट सुरू होतील. पण कोविडची तिसरी लाट आली, तरी ऑक्सिजन कुठेही कमी पडणार नाही ही तयारी आपण केली आहे. पण कोविडच्या तिसऱ्या लाटेची वेळ येऊ नये ही माझी प्रार्थना आहे.
गेल्या वर्षी १ मे ला लॉकडाउनच होता. याही वर्षी फारसा फरक नाहीये. हे काय दुष्टचक्र मागे लागलंय ते कळत नाहीये. साधारण आपण लॉकडाउन सदृश्य निर्बंध घातले आहेत. तुम्ही बंधनं टाकली तर त्यावर झालं काय? कालच उच्च न्यायालयाने विचारलं आहे की आजच्या बंधनांपेक्षा अधिक कडक लॉकडाउन लावण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं याहून कडक निर्बंद लादण्याची आवश्यकता फारशी येणार नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत.

Related posts