महाराष्ट्र

राज्यांनी ऑक्सिनची मागणी नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं; पियुष गोयल यांचं अजब वक्तव्य

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत असून, त्यामध्येच आणखी एका संकटाचीही भर पडताना दिसत आहे. हे संकट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. राज्याराज्यांमध्ये होणारा ऑक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनंही आता काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचअंतर्गत आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वे धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून राज्यांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा केला जाणार आहे.
ऑक्सिजन सिलेंडर आणि टँकर रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रीन कॉरिडोरनं मोठी मदतही होणार आहे.
‘नऊ क्षेत्र वगळता 22 एप्रिलपासून तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असं गोयल म्हणाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं.
कोविडचं संकट येण्यापूर्वी भारतात दर दिवशी 1,000-1,200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, 15 एप्रिलला देशात 4795 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागच्या वर्षीपासून ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगितलं.

Related posts