महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेकजण कोरोनाबाधित असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे आम्ही झूमवर संवाद साधला, त्यातील चर्चा झालेले मुद्दे.
• महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात त्या राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे.
• मागच्या लॉकडाऊनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही.
• छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.
• लॉकडाऊनच्या काळात वीजबिलं माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिलं कशी भरायची?
• बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी.
• शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा, १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना ह्यावर्षी उत्तीर्ण केलं पाहीजे.
• ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा.
• खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी आणि जिमसारख्या जागा जिथे गर्दी न होऊ देता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी.
• अनेक खासगी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत.
• हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही.
• कंत्राटी कामगारांना काढायचं पुन्हा कोरोना वाढला कि घ्यायचं ह्यापेक्षा सरकारने महापालिकांमध्ये कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यायला हवं.
• मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा आहे. अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नाही. माझी माध्यमांना विनंती आहे की मूळ मुद्दा भरकटू देऊ नका.
• परमबीर सिंग ह्यांना १०० कोटींच्या टार्गेटची आठवण त्यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवलं गेल्यावरच का झाली? आधी का नाही झाली? आणि बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप होणंच लांच्छनास्पद आहे.
• मला काल एकाने विनोद सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’
• माझे पक्षातील सहकारी जमील शेख ह्यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचा पदाधिकारी नजीम मुल्ला ह्याचं नाव आलं आहे. ह्याच पदाधिकाऱ्यांचं नाव सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. ह्याप्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावं.
• राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी. असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे.

Related posts