माळशिरस

विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करा : सयाजी शिंदे

राज्यात १५ लाख वृक्ष लागवड करण्याचा विठ्ठल चरणी संकल्प
अकलूज / प्रतिनिधी – यंदा कोरोनामुळे आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” या संत वचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या घरासमोर विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करुन श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिने अभिनेते व सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले .
सह्याद्री वनराई संस्था , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती , श्री क्षेत्र पंढरपूर , श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , श्री संत तुकाराम महाराज संस्थान , श्री क्षेत्र देहू यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू – आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे , श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष ॲड विकास ढगे पाटील , श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे , सोहळा प्रमुख अजित मोरे , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह गावोगावचे सरपंच , ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .
सिनेअभिनेते शिंदे म्हणाले , वारकऱ्यांना यंदा कोरोनामुळे आषाढी वारीला येता आले नाही याचे दु:ख आहे . हे दु:ख विसरायचे असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची उर्जा देतो .त्याची आपल्या दारात , शेतात , गावात लागवड करुन त्याची श्री पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा व जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला घाला . तो तुम्हाला आयुष्यभर जगण्याची उर्जा देइल . झाडे लावताना वड , पिंपळ , लिंब , चिंच , उंबर , आंबा , आवळा , जांभूळ याच देशी झाडांची लागवड करा असे ते म्हणाले .


संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सोपानकाका , संत निवृत्तीनाथ , संत एकनाथ , संत मुक्ताबाई , संत नामदेव , माता रुक्मिणी , संत चांगावटेश्वर आदी संतांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या सुमारे १५ लाख वारकऱ्यांनी आपआपल्या गावी १५ लाख झाडे लावण्याचा विठ्ठल चरणी संकल्प केला असल्याचे हरीत वारीचे प्रणेते व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे यांनी सांगितले .
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सुमारे ४५० दिंड्या आहेत . या दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्या गावी तर पालखी मुक्कामाच्या गावात पालखी तळावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन ॲड विकास ढगे पाटील यांनी केले .
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्या आहेत . या दिंडीकर्याना वृक्ष लागवडीसाठी संपर्क केला आहे . प्रत्येक दिंडी प्रमुखांनी एकादशी दिवशीच वृक्ष लागवड करावी असे आवाहन अध्यक्ष मधूकर मोरे यांनी केले .