पंढरपूर

नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात

‘डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले’-तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ

सचिन झाडे
पंढरपूर-

‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होत आहे. ’ असे प्रतिपादन तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ यांनी केले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी नांदोरे (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे साठ पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. प्रास्ताविकात प्रा.सुनील भिंगारे यांनी डॉ.रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली व नांदोरेमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले.

यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘नांदोरे मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला मागील काही दिवस धैर्याने टक्कर देत धीरोदात्तपणे जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाचे कौतुक करावेसे वाटते. या गावातील जागरूक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मदत करण्याचे ठरवले. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची आहे. त्यामुळे धीर सोडू नका. येथील अवस्था पाहून छोटीशी मदत करावीशी वाटली तरी त्याचा आपण स्विकार करावा.

तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना ‘कमवा व शिका’ योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले. यावेळी नांदोरे मधील सुमारे साठ पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, माजी सरपंच भीमराव वाघ, माजी उपसरपंच हरिश्चन्द्र भिंगारे, विलास सातुरे, अनिल भिंगारे, रामचंद्र भिंगारे, विठ्ठल भिंगारे, मोहन साळुंखे, प्रशांत साळुंखे, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह नांदोरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts