अक्कलकोट (प्रतिनिधी) –
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रमाने संपन्न झाला.
स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमीत्त कोल्हापूर येथील स्वामी समर्थ लाईट डेकोरेटर्स यांच्या वतीने अविनाश सुर्यवंशी व सहकाऱ्यांनी वटवृक्ष मंदीरास आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामी चरणी रुजू केली आहे.
सध्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. ३० एप्रिल २०२१ अखेर मंदीर बंद ठेवण्याचे आदेश असल्याने मंदीर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी व मोजके सेवेकरी वगळता अन्य कोणत्याही भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही. दरम्यान मंदीरातील श्रीचे नित्योपचार व आरती नियमीतपणे सुरू आहेत. या पाश्वभूमीवर आज बुधवार दिनांक १४ एप्रिल स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. यानंतर स्वामी पुण्यतिथी निमित्त आज प्रकटदिनापासून पुण्यतिथीपर्यंत पहाटे ४ वाजता निघणारी प्रभातफेरीची अनेक वर्षांची परंपरा यंदा सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या व्यत्ययामुळे खंडीत झाल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली.
दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभारा मंडपात पुरोहित मंदार पुजारी व मंदिर समितीचे चेअरमन यांच्या हस्ते मंदीर समितीचे पदाधिकारी व मोजके सेवेकरी यांच्या उपस्थितीत गुलाल, पुष्प वाहून, भजन गीताने पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर श्रींची नैवेद्य आरती संपन्न झाली. अशा प्रकारे यंदा कोरोनाच्या सावटाखाली संपन्न झालेले श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन कोणत्याही भाविकांच्या अनुपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सद्या मंदीर बंद असल्याने अनेक भाविकांना स्वामी दर्शनापासून वंचित रहावे लागत असल्याचे खंत असून या कोरोना संक्रमणाशी लढण्याकरिता प्रत्येकास स्वामी समर्थानी बळ द्यावे व लवकरात लवकर या जागतिक संकटातून सर्वांना स्वामींनी सुखरूपरित्या तारून घ्यावे याकरिता स्वामींच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे मनोगत समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, कौसल्या जाजू, संपतराव शिंदे, पो.नि.विजय जाधव, पो.नि. कलप्पा पुजारी, धनराज शिंदे, रामचंद्र समाणे, बाळासाहेब घाटगे, मल्लीनाथ स्वामी, प्रथमेश इंगळे, श्रीपाद सरदेशमुख, राजेश निलवाणी, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, इत्यादी उपस्थित होते.