Blog

कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही

सागर रामभाऊ तायडे

कोरोनाने जगातील सर्व मानव जातीला अनेक संकटात टाकले.आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी घरात किती दिवस बसून राहायचे आणि  उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसतांना किती दिवस जगायचे हा प्रत्येक माणसाच्या समोर प्रश्न उभा राहत आहे.जे सुरक्षित नोकरी करतात त्यांच्या कडे सुरक्षित ठेव असणार पण जे दररोज रोजनदारी वर काम करून पोट भरतात त्या असंघटित कष्टकरी कामगार मजुरांच्या समोर लॉक डाऊन मोठे संकट उभे राहिले आहे. सर्व उद्योग धंदे बंद असल्यामुळे त्यांच्या नेहमीच्या संकटात आणखी भर पडली आहे. त्यांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागतोच आता जिवंत राहण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागत आहे.बहुजन, मागासवर्गीय, ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक मजूर, शेतमजूर,कामगार असणाऱ्यांना मांगीतल्याने काही मिळणार नाही, त्यासाठी त्यांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.आपना सर्वांना माहीत आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा महान संदेश आहे. “मांगीतल्याने मिळत नाही,संघर्षा शिवाय पर्याय नाही.” “शिका,संघटीत व्हा आणी संघर्ष करा.हा क्रम लोकांनी बदलून टाकला प्रथम आपसात संघर्ष करतात. त्यांचा फायदा दुसऱ्या समाजाने घेतला की एक दिवसा करीता संघटित होतात.किंवा एक दोन महिने राज्यभर एका जातीची जनआंदोलन होतात.मग त्यातुन काय शिकतात?. बहुसंख्येने मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक समाज हा मजूर,कामगार आहे. तो मजूर कामगार म्हणून कुठे एकत्र येतो का?. जातीसाठी एकत्र येऊन लढतो तोच जर मजूर कामगार म्हणून एकत्र आला तर त्याला हक्काचा रोजगार कायमस्वरूपी मिळू शकतो. त्यासाठी मजूर , कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.

असंघटित राहीला तर अनेक मार्गाने तुमचे शोषण होत राहणार आहे. आणि संघटित झाला तर शोषण थांबवून अनेक सरकारी योजनेचा कायमस्वरूपी लाभार्थी ठरणार आहात. कोरोना लॉक डाऊन नंतर परिस्थिती धक्कादायक पणे बदलणार आहे. एकट्या दुकट्याने न्याय,हक्क अधिकारांची भाषा केली तर चिरडून मारल्या जाईल. हे आताच्या काळात असंघटित मजूर,कामगारांनी लक्षात घ्यावे.    आरक्षणातील पदोन्नती साठी संघटित कामगार कर्मचाऱ्यांचा जो संघर्ष आज सुरू आहे.त्यांनी इतिहास वाचला असता तर?.जगातील ज्या काही क्रांत्या झाल्यात त्यामध्ये कामगारांची अहंम भूमिका होती. कामगार संघटनांनी शासनावर नियमितपणे दबाव ठेवावा, जर शासन ऐकत नसेल तर कामगारांच्या संख्येच्या बळावर सत्ता हस्तगत करावी. ही बाब बाबासाहेबांनी मुबंईच्या मील संपाच्या भाषणात प्राकर्षाने सांगितले होती. पण आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा फायदा अनेक मनूवादी कामगार संघटनांनी उचलला.त्यांनी राष्ट्रीय ट्रेंड युनियन बनविल्या, भांडवलदार आणि सत्ताधारी पक्षाची त्यांनी दलाली सूरू केली. आणि आम्हाला असंघटित करून जात,धर्म, प्रांतात गुंडाळून ठेवले. त्यामुळेच असंघटीत कामगारांच्या दरवर्षी फौजा निर्माण होत आहेत. कामगार कल्याण मंडलात सर्व त्यांचेच प्रतिनिधी (नोंदणीकृत कामगारांच्या सभासद संख्येनुसार) आहेत. त्यामुळे आजही आम्हाला minimum vej (किमान मजूरी) पूरेशी मिळत नाही. जनआंदोलनात आमची भाषा मात्र नेहमी “असा कसा देत नाही?. घेतल्या शिवाय राहत नाही!.” अशी असते. त्यामुळे आपल्याला जमिनीवर उभे राहून भान ठेवून बोलले व वागले पाहिजे.राष्ट्रीय संघटन बनविले पाहिजे की नाही?. किमान वेतन न दिल्या गेल्यामुळे देवयानी खोब्रागडे यांना परदेशात काय भोगावं लागलं हे यादेशातील प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती तरी महिने ओरडून सांगत होती. मिनीमम वेजचे इतर देशात काय महत्व आहे हे आपल्या देशातील कोणत्याच कामगारांच्या ट्रेंड युनियन व मीडियाच्या लक्षात आले नाही. त्या बाबत कामगारांना यांची साधी माहिती नाही.त्यांना कामगार, कर्मचारी म्हणून काय अधिकार आहेत यांची माहिती कोणी सांगितली पाहिजे?.  जाती साठी संघर्ष करणारे हे सांगत नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे फक्त वर्गव्यवस्थेवर बोलतात, जाती शोषणावर बोलत नाही. तरी बहुसंख्येने मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक मजूर,कामगार त्यांच्याच लाल बावट्या खाली जातात. ते ही त्यांना सांगतात कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.  स्वतंत्र मजदूर यूनियन (आय एल यु ) संपूर्ण देशभर रेल्वे, विद्युत,बँक,शिक्षक, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर,व सर्व संघटीत,असंघटीत कामगारांच्या संघटनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे. आपल्या मूलभूत हक्काची लढाई राज्य व केंद्रा सरकारच्या विरोधात संघर्ष करीत आहे.८ डिसेंबर २०१७ ला दिल्लीच्या रामलीला मैदानात लाखो आरक्षण लाभार्थी सहकाऱ्यांना सोबत घेऊन विशाल रॅली घेऊन राष्ट्रीय पातळीवर आम्ही आहोत हे केंद्र सरकारला प्रथमच दाखवुन दिले. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यांची योग्य नोंद घेतली व आज त्या संदर्भातील पत्रव्यवहार होत आहे. म्हणजेच कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.त्या शिवाय कोणी नोंदच घेत नाही.  बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व कामगार, कर्मचारी बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे की “नाव भिमाचं नी काम बापूचं” सोडून द्या. “नावंपण भिमाचचं नी काम पण भिमाचंच” यासाठी स्वतंत्र मजदूर युनियनचे संघटनेचे सदस्य बनून स्वाभिमानाने जगण्यासाठी कामाला लागा. तुमच्या खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांना संघटीत करून त्यांची ट्रेंड युनियन रजिस्ट्रेशन करा त्यांचे संस्थापक अध्यक्ष तुम्हीच राहा पण ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारधारेच्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आय एल यु शी संलग्न करा.अन्यता केवळ आरक्षणच नाही,तर भारतीय संविधान नष्ट झाल्या शिवाय राहणार नाही.राजकीय गटबाजी संपविण्यासाठी ट्रेंड युनियनलाच पुढाकार घ्यावा लागेल.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली ट्रेंड युनियन ने काम केल्यामुळे कामगार कर्मचारी उद्धवस्त झालेत.राजकीय पक्ष हा नेहमी भांडवलदारांच्या आर्थिक मदतीने निवडणूका लढत असतो. त्याबदल्यात तो कामगार कर्मचाऱ्याच्या शोषण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उचलत नाही, राजकीय नेते कामगार कर्मचाऱ्यांना अपंग बनवुन ठेवतात.म्हणूनच जाती संघटना पेक्षा कामगार संघटना मोठया असतात.हा इतिहास सर्व कामगार कर्मचारी यांनी लक्षात घ्यावा. 
  आताचे सरकार आर एस एस प्रणित आहे त्यांना यादेशाचे संविधान नको आहे,ते नष्ट करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे त्या हिसेबानी ते कामगार कायदे कानून गुंडाळून मनुवादी मनुस्मृतीची अंमलबजावणी करीत आहेत. कोरोना लॉक डाऊन ची भीती घालून सर्वांनाच घरात बंदीस्त नव्हे तर नजरकैदेत ठेवले आहे. बाहेर मोदी आर एस एस ला जे हवे आहे त्यांची अंमलबजावणी करीत आहेत. बहुसंख्य बहुजन समाजाला त्यांची माहिती नाही ते गर्वसे कहो हम हिंदू है म्हणण्यात गुंग आहेत. त्याचं बरोबर पुरोगामी, समाजवादी, आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही पक्ष संघटनेकडे या विरोधातील कृती कार्यक्रम नाही.आता आपण कामगार कर्मचारी गप्प बसलो तर केवळ आरक्षण नाही,तर संविधान लोकशाहीच्या मार्गानेच संपविल्या जाईल.नंतर एक होतं संविधान असे म्हणण्याची पाळी आपल्यावर यायला ऊशीर लागणारं नाही.हीच वेळ आहे निर्णय घेण्याची यांचे उत्तर बाबासाहेबांनी तेव्हा दिले होते.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १२ व १३ फेब्रुवारी १९३८ साली मनमाड येथे रेल्वे गँगमन कामगारांच्या दोनदिवशीय परिषद मध्ये सांगितले होते. सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन बनवुन स्वतंत्र मजदूर युनियन शी संलग्न करा.आज आता आरक्षण लाभार्थीची नोकरी धोक्यात आली आहे, नव्हे पुढील पिढीचे भविष्य अंधकारमय होणार आहे. म्हणूनच सर्व आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांनी ट्रेंड युनियन मध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आता आपली खरी ओळख दाखविण्याची वेळ आली आहे.भारतातील बहुसंख्येने कामगार कर्मचारी हा मागासवर्गीय शोषित,पिढीत,आदिवासी आणि अल्पसंख्याक अन्यायग्रस्त असल्याने त्यांना ७० वर्षानंतर ही सामाजिक व आर्थिक न्याय मिळू शकला नाही. आताच्या आर एस एस प्रणित भाजपा सरकारने एक हजार कामगार कायदे विना चर्चा रद्द करून टाकले.शेतकरी शेतमजूर, असंघटीत कामगार यांचे प्रश्न तर संघटीत कामगारांच्या प्रश्नापेक्षा विक्राळ स्वरूपात उभे आहेत. त्यावर प्रस्थापित कामगार चळवळी कोणताच वैचारिक संघर्ष करण्यासाठी तयार नाही. त्याचे दुःख मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांना बिलकुल नाही. भारतात आजमितीला सात टक्के संघटीत कामगारांच्या ५५ हजार युनियन नोंदणीकृत आहेत.तर ९३ टक्के असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय युनियन नाहीत. त्यांच्या करीता वैचारीक पातळीच्या तेरा राष्ट्रीय ट्रेंड युनियन कार्यरत आहेत. त्यांची अधिकृत मान्यता ही मागासवर्गीय कामगार कर्मचाऱ्यांच्या मेंबरशिप वर अवलंबून आहे.त्या या प्रमाणे आहेत.१) ऑल इंडिया ट्रेंड युनियन काँग्रेस (AITUC ),२) सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (CITU),३) भारतीय मजदूर संघ (BMS), ४)हिंद माजदूर किसान पंचायत (HMKP), ५) हिंद मजदूर सभा (HMS), ६) इंडियन फेडरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन (IFFTU), ७) इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस (INTUC), ८) नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेंड युनियन (NFITU), ९) नॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (NLO), १०) ट्रेंड युनियन को-ऑडीनेशन सेंटर ( TUCC), ११) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस (UTUC), १२) युनायटेड ट्रेंड युनियन काँग्रेस-लेनिन (UTUC-L), १३) कॉन्फडेरेशन ऑफ फ्री ट्रेंड युनियन ऑफ इंडिया (CFTUI).यांची राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी त्यांचे सांस्कृतिक संस्कार एकच आहेत. हे आम्ही विसरतो.म्हणूनच आय एल यु ला राष्ट्रीय ट्रेंड युनियन चा दर्जा मिळू शकला नाही.असा कसा देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही!. ही भाषा आता बंद करावी, आणि भविष्य उज्वल करण्यासाठी आरक्षण लाभार्थी कर्मचाऱ्यांनी स्वाभिमानी बनावे!.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेे शेवटचे शब्द बघा हे वाचून तरी सगळयांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करतो. बाबासाहेब म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो, तो फक्त तुमच्यासाठी तुम्ही सुखात रहावं म्हणून यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष नाही दिलं मी नामवंत विद्यापिठाच्या पदव्या घेऊन आलो M.A.,PH.D., M.sc,D.sc, L.L.B.तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाची नोकरी सरकार देत होते. पण मी ती नाकारली. का?. कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्याचा होता.मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो.पण नाही.माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी.मी तुमच्यासाठी गोलमेज परिषदेत भांडलो. महार,मांग,चांभार,सुतार, लोहार,माळी,धनगर, कुणबी, कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो.मी हिंदु धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धम्म स्विकारला.पण मी माझ्या हिंदु माता-भगिनींसाठी “हिंदु कोड बिल” बनवलं.त्यात मी स्त्रीयांसाठी घटस्फोटाचा अधिकार वडीलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले.मी तुम्हाला एवढं सगळं दिलं.मी संविधानात SC, ST,OBC, NT यांना आरक्षण दिलं.पण बांधवांनो तुम्ही मला व चळवळीला काय दिले?. तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा.हे सर्व बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी यांनी एक व्हावे. तुम्ही सर्वांनी एकत्र या कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटांशी सामना करू शकाल. म्हणूनच मजूर, शेतमजुरांना कामगारांना संघर्षा शिवाय पर्याय नाही.संघटित व्हा कोरोना लॉक डाऊन नंतर परिस्थिती धक्कादायक पणे बदलणार आहे. एकट्या दुकट्याने न्याय,हक्क अधिकारांची भाषा केली तर चिरडून मारल्या जाईल. हे आताच्या काळात असंघटित मजूर,कामगारांनी लक्षात घ्यावे. असंघटीता कोणी ही अन्याय अत्याचार करतो.संघटीतावर अन्याय,अत्याचार करतांना शंभरदा विचार करावा लागतो.म्हणूनच असंघटीत ही ओळख पुसून काढा.संघटीत व्हा

 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९. अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य,

Related posts